नाशिक: अंबड एमआयडीसीतील धोकादायक खड्ड्याने घेतला आणखी एक बळी; व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढत आहेत अपघात; अंबड एमआयडीसीतील दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप
नाशिक | ३० जुलै २०२६: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अंबड एमआयडीसी परिसरातील एक्स्लो पॉइंट चौकातील धोकादायक खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात आणखी एका व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली आहे. कामटवाडे येथील रहिवासी आणि व्यावसायिक नीलेश प्रल्हाद कोतकर (वय ४०, रा. आनंदनगर) यांचा अपघातानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२८ जुलै) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास नीलेश कोतकर हे एक्स्लो पॉइंट परिसरातून डीजीपीनगर-२ मार्गे आपल्या राहत्या घरी दुचाकीवरून जात होते. एक्स्लो पॉइंट चौकात मोठा खड्डा असल्याने तो टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शेजारून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. धडकेमुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर जोरात कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत वडाळा रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे.
खड्ड्यांमुळे मृत्यूंची संख्या चारवर
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत असून आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यापूर्वी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात प्रभाकर निकम (वय ४९) यांचा मृत्यू झाला होता. श्रमिकनगर परिसरात रस्त्यातील खड्ड्यात दुचाकी घसरल्याने माजी सैनिक प्रवीण गायकवाड (वय ५४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच मेरी परिसरातील खोदलेल्या रस्त्यावर दुचाकी घसरल्याने दीपाली बेळे (वय ६६) यांनाही जीव गमवावा लागला होता. आता नीलेश कोतकर यांच्या मृत्यूमुळे या दुर्घटनांची संख्या चारवर पोहोचली आहे.
राजकीय वातावरणही तापले
या घटनेनंतर शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट अवस्थेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावर विविध राजकीय पक्षांनी महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात धडक देत आंदोलन केले, तर दुसरीकडे मृताच्या नातेवाईकांनी शहर अभियंत्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
नागरिकांमध्ये संताप; कठोर कारवाईची मागणी
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, रखडलेली दुरुस्तीची कामे आणि देखभालीतील निष्काळजीपणा यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार जीवितहानी होत असतानाही संबंधित यंत्रणा प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
याप्रकरणी रस्त्यांच्या देखभालीसाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक, व्यापारी संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.
शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करून अशा दुर्घटनांना आळा घालावा, अन्यथा भविष्यात आणखी निष्पाप नागरिकांचे जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.